सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम
प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपघाताचा धोका मुंबई / रमेश औताडे राज्यातील प्रमुख शहरे आणि उपनगरांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांनी अक्षरशः विळखा घातला असून लोकप्रतिनिधी सोबतच सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन मात्र केवळ तात्पुरत्या कारवायांपुरतेच मर्यादित राहत असल्याचा आरोप पादचारी करत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने आपत्कालीन सेवा अडथळ्यात सापडण्याचा धोका वाढला आहे. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहन वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या मार्गातून चालावे लागत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीच्या भागात वाहतुकीचा वेग मंदावत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व...