ठाण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’
ठाणे : रमेश औताडे
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इको फ्रेंडली लाइफ (EFL) संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ अभियान’ या व्यापक संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमात ‘एक कुटुंब – एक शक्तिस्थळ’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धनाचे केंद्र उभारावे, या विचाराला अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे.
देशभरात वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने ७०० कोटी वृक्षांचे अभियानात्मक उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. संस्थेचे प्रेरणास्थान सर श्री अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रभात फेरीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत तलाव पाळी, जांभळी नाका, ठाणे येथून सुरुवात होणार आहे. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment