बृहन्मुंबई महानगरपालिकेचे " वृक्ष संजीवनी " अभियान

    पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन यांचाही सहभाग

मुंबई / रमेश औताडे 
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी  ‘ वृक्ष संजीवनी ’ अभियान राबविण्यात येत आहे.  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘ वृक्ष संजीवनी ’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही यामध्ये समाविष्ट आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले होते. तसेच १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक हटविण्यात आले होते. यासोबत झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळे काढण्यात आले होते. या अभियानामुळे वृक्षांना आवश्यक पाणी व प्राणवायू मिळून सुदृढ वाढ होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, वृक्षांच्या मुळांभोवती काँक्रिट असल्यास पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. तसेच खिळे, वायर व जाहिरात फलकांमुळे झाडांच्या खोडाला इजा होऊन भविष्यात झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत जनजागृती करणे, हे वृक्ष प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व आहे.

या अभियानात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधनांचा वापर करुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
भारत सरकार नोंदणीकृत


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा