मनसेच्या दणक्याने रुग्णाला दिलासा
पैसे भरा मगच रुग्णाला दाखल करा
मनसेच्या दणक्याने रुग्णाला दिलासा
मुंबई / रमेश औताडे
नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातून अधिकृतपणे संदर्भ करून पाठवलेल्या गंभीर रुग्णाला मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश नाकारल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनाला कठोर शब्दांत निषेध करत, कायदेशीर कारवाईची ठाम चेतावनी दिली आहे. या गंभीर प्रकारामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता, या घटनेमुळे नवी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर थेट आघात झाल्याची भावना मनसेने व्यक्त केली आहे.
गंभीर प्रकृतीचे रुग्ण गणेश फसे यांना ५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातून फोर्टिस हॉस्पिटलला अधिकृतपणे संदर्भ करण्यात आले. मात्र, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री जेव्हा रुग्णाला दाखल करण्यासाठी नेण्यात आले, तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अमानवी आणि बेजबाबदार भूमिका घेतली. आय सी यू बेड उपलब्ध असूनही, नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय संदर्भ रुग्णांना रात्री प्रवेश दिला जात नाही, असे सांगत रुग्णास प्रवेश नाकारण्यात आला. याउलट, खाजगी रुग्ण म्हणून भरती करायचे झाल्यास तात्काळ ८० हजार भरण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
मनसेच्या म्हणण्यानुसार, फोर्टिस हॉस्पिटल आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या करारानुसार, फोर्टिसने कोणत्याही क्षणी १५ खाटांपर्यंत संदर्भ रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. घटनेच्या दिवशी केवळ ११ रुग्ण दाखल होते, म्हणजेच किमान ४ बेड उपलब्ध असतानाही रुग्णाला प्रवेश नाकारला गेला. "ही कृती ही निष्काळजीपणा, असंवेदनशीलता आणि बेकायदेशीरता यांचा संगम असून, रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे," असे मनसेचे मत आहे.
या घटनेनंतर मनसे विभाग अध्यक्ष व राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष सदस्य, सागर विचारे यांनी २२ सप्टेंबर रोजी फोर्टिस हॉस्पिटलला लेखी निवेदन दिले. निवेदनात त्यांनी प्रशासनाला ७ दिवसांची मुदत देऊन स्पष्ट उत्तर व कारवाईची मागणी केली होती. मात्र, १५ दिवस उलटूनही हॉस्पिटल प्रशासनाने कोणतेही लेखी उत्तर दिले नाही. वारंवार संपर्क साधूनही हॉस्पिटलकडून असंवेदनशील शांतता आणि दुर्लक्ष अनुभवण्यास मिळाल्याचे मनसेने म्हटले आहे.
हॉस्पिटलच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे मनसेने थेट मैदानात उतरत, फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर माहितीफलक लावले आहेत. या फलकांवर, "नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय रेफर रुग्णांसाठी मदतीची गरज असल्यास मनसेशी संपर्क साधावा," असे स्पष्ट लिहिले आहे. गरजूंना मदतीसाठी मनसे नेहमी सज्ज असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. मनसेच्या या कृतीला केवळ इशारा नसून, भविष्यातील घटनांना रोखण्यासाठी घेतलेले ठोस पाऊल मानले जात आहे.
मनसेने दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानुसार, जर रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्या, तर नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग व पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच, रुग्णालय प्रशासनाविरोधात न्यायालयीन स्तरावर करारभंग, निष्काळजीपणा व फौजदारी कारवाई केली जाईल, असे मनसेने स्पष्ट केले आहे.
"ही बाब कोणत्याही एका रुग्णापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण नवी मुंबईतील सामान्य नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जर महापालिकेच्या रेफरन्सवर असलेल्या रुग्णांनाही पैसे भरल्याशिवाय बेड मिळणार नसेल, तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणांची शाश्वतीच संपुष्टात येईल," असे मनसेने म्हटले आहे. आरोग्याच्या नावाखाली चालणाऱ्या अमानवी व्यवसायांना माफ केले जाणार नाही अशी मनसेची ठाम भूमिका आहे.
Comments
Post a Comment