तुतारीच्या सुरातून सामाजिक ऐक्याचा संदेश
मुंबई / रमेश औताडे
साहित्यभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, मुंबई प्रदेश आणि आंबेडकरी विचार मंच यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवत सामाजिक ऐक्याचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला.
"तुतारी आम्हीही वाजवली; मात्र तिच्या प्रत्येक सुरात लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे समतेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार घुमले पाहिजेत," असे आंबेडकर विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले.
रॅलीदरम्यान बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि आदिवासी समाजाच्या ऐक्यासाठी शपथ घेण्यात आली. विविध समाजघटकांनी एकत्र येत संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक सलोखा आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हातात बॅनर, पिवळे झेंडे आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश दिला.
Comments
Post a Comment