जनआक्रोश मोर्चानंतर झोपडी धारकांना मिळाला न्याय
जनआक्रोश मोर्चानंतर झोपडी धारकांना मिळाला न्याय
मुंबई / रमेश औताडे
बोरीवली, गोराई रोड: महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) यांच्यावतीने एक वर्षापूर्वी बीएमसी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चामुळे झोपडी धारकांना न्याय मिळाला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून २५६ झोपडीधारकांच्या घरांची नोंद असूनही केवळ १०६ झोपडीधारकांना पुनर्वसन मिळाल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. उर्वरित १५० रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे, या मागणीसाठी हा मोर्चा एक वर्षापूर्वी आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत पालिका अधिकारी कापसे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या बैठकीत कापसे यांनी उर्वरित झोपडीधारकांची पात्रता तपासून पुनर्वसनाची हमी दिली होती.
आता, त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करत ९१ झोपडीधारकांना पुनर्वसन देण्यात आले आहे. रहिवाशांना अलॉटमेंट लेटर आणि चाव्या वाटप करून त्यांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे.
यासाठी स्थानिक खासदार गोपाळजी शेट्टी, अजितदादा रावराणे, तसेच मोर्चाचे आयोजन करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment