दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा
दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा
मुंबई / रमेश औताडे
दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात ७४ मजली आलिशान निवासी टॉवर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘वन मरीना’ या नावाचा हा प्रकल्प वायएम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त सहकार्याने साकारला जाणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे २८०० कोटी रुपये आहे. या भागातील हा सर्वात उंच निवासी टॉवर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या टॉवरमध्ये २, ३ आणि ४ बेडरूमच्या सदनिका तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस प्रकारातील घरे असतील. घरांच्या किमती सुमारे ७ कोटी रुपयांपासून ४५ कोटी रुपयांपर्यंत असतील. प्रत्येक मजल्यावर सुमारे सहा सदनिका ठेवण्यात येणार असून, गोपनीयता आणि प्रशस्त समुद्रदृश्य यावर भर देण्यात आला आहे. सुमारे ९५ टक्के घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असतील. समुद्रसपाटीपासून १३१ फूट उंचीवर पहिला राहण्यायोग्य मजला असेल, अशी माहिती देण्यात आली.
या टॉवरमध्ये ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इमारतीचा काचांचा दर्शनी भाग उष्णता कमी ठेवणाऱ्या विशेष काचांनी तयार करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी ७२२ गाड्यांची व्यवस्था आठ पोडियम स्तर आणि दोन तळमजल्यांमध्ये करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी वायएम इन्फ्रा समूहाचे अध्यक्ष सुहैल याकुब म्हणाले की, “वन मरीना हा केवळ आलिशान पत्ता नसून दक्षिण मुंबईतील जुन्या जागांना नवे रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराच्या विकासात भर घालणारा हा प्रकल्प ठरेल.”
वायएम इन्फ्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अतिफ याकुब यांनी सांगितले की, “जिथे इतरांना अडचणी दिसतात तिथे संधी ओळखून अचूक नियोजनाने प्रकल्प उभा करणे ही आमची ताकद आहे. हा प्रकल्प शहरासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करेल.”
अश्विन शेठ समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन एन. शेठ यांनी सांगितले की, “दक्षिण मुंबईत पुन्हा एक महत्त्वाचा प्रकल्प साकारताना आम्हाला आनंद होत आहे. दर्जा, काटेकोर अंमलबजावणी आणि दीर्घकालीन मूल्य यावर आमचा भर असेल.”
या प्रकल्पाची वास्तुरचना ‘आर्क बाय रेजा काबुल आर्किटेक्ट्स’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेकडून करण्यात येत आहे. रचनात्मक सल्लागार म्हणून महिमतुरा कन्सल्टंट्स, तर यांत्रिक व विद्युत सल्लागार म्हणून पीडीए असोसिएट्स काम पाहणार आहेत. प्रकाशयोजनेसाठी क्वांट लेझर्स या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसर रचना ‘साइट कॉन्सेप्ट्स इंटरनॅशनल’ (फिलिपाईन्स) या संस्थेकडून केली जात आहे.
वायएम इन्फ्रा समूह हा मुंबईस्थित स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रातील कंपनी असून दक्षिण आणि मध्य मुंबईत पुनर्विकास प्रकल्पांवर भर देतो. सध्या सुमारे २५ लाख चौरस फूट क्षेत्र विकसित केले जात असून २१०० हून अधिक घरे बांधकामाधीन आहेत.
अश्विन शेठ समूहाची स्थापना १९८६ मध्ये झाली असून मुंबई व दुबई येथे ८० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. समूहाने आतापर्यंत ४ कोटी चौरस फूटांहून अधिक बांधकाम पूर्ण केले असून ३५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना घरे दिली आहेत.
दक्षिण मुंबईतील मर्यादित उपलब्ध जागा आणि समुद्रकिनाऱ्यालगतचा परिसर लक्षात घेता ‘वन मरीना’ हा प्रकल्प उच्चभ्रू गृहनिर्माण बाजारपेठेत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
Comments
Post a Comment