सफाई कामगारांच्या घराचे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होणार - अशोक जाधव यांचा सरकारला इशारा
नागपूर / रमेश औताडे
शहराची स्वच्छता करत असताना आपल्या मालकी हक्काचे घर कधी होणार. अशी स्वप्न अनेक वर्ष पाहत असणारा सफाई कामगार आता नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करून हक्काचे घर मागत आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होईल असा इशारा म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.
मुंबईतील २१ हजार ८६८ सफाई कामगारांपैकी केवळ पाच हजार ८०० कामगारांना सरकारने मालकी हक्काची घरे दिली असून उर्वरित हजारो कामगारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या अन्यायाविरोधात म्युनिसिपल मजूर युनियनने नागपूर विधानसभेसमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले. अनेक वर्षांपासून शासन व महापालिकेकडे मालकी हक्काच्या घराची मागणी केली. मात्र अद्यापही १६ हजार हून अधिक कामगारांना घर मिळालेले नाही. विधानसभेच्या समित्यांमध्येही कामगारांच्या घरकुल निर्णयाला संमती देण्याची चर्चा झाली होती. परंतु अंतिम निर्णय लांबत चालल्याने कामगारांच्या सहनशक्तीचा अंत होत असल्याचे युनियनचे सरचिटणीस वामन झरेकर, कार्याध्यक्ष रामचंद्र बिराजदार यांनी सांगितले.
Comments
Post a Comment